
भारतात विपस्सना विधि ही बुद्धाच्या आधीपासूनच सुरु होती. “आलार कालाम” नावाचे ऋषी तिचे प्रवर्तक होते. त्यांच्या आश्रमात गौतमाने ते शिक्षण घेतले आणि तिला सोडून पण दिले. कारण ते टाकावू वाटले. व्यवहारिक वाटले नाही. आजमात्र त्याच टाकावू “समाधीला भिक्षु लोक बळी पडत असतील आणि त्यांचा प्रचार करीत असतील तर त्यांच्या या कृत्याला धम्म प्रचार म्हणायचे का? आर्य अष्टांगिक मार्गात “सम्यक समाधी” म्हणून एक मार्ग आहे. तो “समाधी” नव्हे तर “सम्यक समाधी” आहे. समाधी हा धर्मविचार आहे. धर्म हिंदू, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम वगैरे लोकांचा आहे तर धम्म हा बुद्धाचा, बौद्धांसाठी आहे. धम्म हा धर्मापासून वेगळा आहे. समाधी, तंद्री, प्राणायाम हा मार्ग बौद्धांचा नव्हे तर हिंदूंचा आहे. भिक्षु बिचारे गुरूने जे सांगितले ते मुकाट्याने ऐकणारे आज्ञाधारी शिष्य. गुरु आंधळा तर शिष्यही आंधळा.
विपस्सना म्हणजे महान तत्वज्ञान का? त्याचा वर्ण, जाती व्यवस्था उच्चाटनासाठी किंवा "आदर्श लोकशाही"च्या निर्मितीसाठी फायदा होतो का? सर्दी-पड्शासारखे रोग तर साध्या हळदीच्या चाय पिल्याने पण दुरुस्त होतात. त्यासाठी दररोज विपस्सनेचा छंद का करावा? वि + पस्सना (पस्स म्हणजे पहा) अर्थात विशिष्ट + पाहणे. याचा अर्थ विशिष्ट दृष्टीने, पद्धतीने पाहणे. विशिष्ट दृष्टी म्हणजे कोणती दृष्टी? श्वास नाकातून शरीरात जातांना त्यावर लक्ष ठेवणे, त्याला किती वेळ रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करणे व ते बाहेर सोडतांना त्यावर लक्ष केंद्रित करणे या पद्धतीने जीवनातील वा समाजातील कोणते प्रश्न सुटू शकतात? श्वासाचा आणि बुद्धीचा काही संबंध आहे का? सर्व अनित्य असतांना चित्त स्थिर कसे होऊ शकेल? चित्ताला स्थिर करण्याचा उद्धेश काय? डोळे लावल्याने शांती मिळते कि डोळ्या समोरील प्रश्नांच्या सोडवणुकीतून शांती मिळते? त्यामुळे सामाजिक परिवर्तन शक्य आहे का? महायानी विचारांच्या हिंदू धर्माचा पगडा इंजिनियर पदावर कार्यरत असलेल्या लोकांवर होतो तेव्हा त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टी आहे म्हणायचे का? जे ज्ञान बहुजनांच्या विकासाला पूरक नाही ते कसे सामाजिक विज्ञान मानावे? आंबेडकरी बौद्ध भिक्षुंवर सुद्धा आहे तर गृहस्थांवर का नसणार? महायानाला बुद्ध विचार मानायचे का? बुद्धाच्या धम्मात समाधी असताना वेगळ्या समाधीची, विपस्सनेची गरज का? बौद्ध लोक धम्माच्या नावावर हिंदू धर्माचे पालन करीत राहिले तर हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार होईल पण धम्माचा होणार नाही. बौद्ध लोक जर तर्कज्ञानी नसतील तर त्यांना कोणीही ठकवू शकतात, जे ठकतात ते दुःखी होतात व ठकवणारे सुखी होतात. स्वार्थी लोकांच्या ठकवेगीरीतून बाहेर पडल्यासच कल्याण आहे, अन्यथा दुख, शोषण आहे. “प्रज्ञा- शील- समाधी” हा शब्दप्रयोग महायानी भिक्षूंनी धम्म प्रचारात वापरला आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे सदाचार व समाधी म्हणजे तंद्री, एकाग्रता, ह्यात कुठेतरी “सम्यक” शब्द वा विचार आला आहे का? सम्यक म्हणजे उचित, योग्य, आदर्श असा अर्थ घेतला तर भिक्षु आपापल्या मताप्रमाणे त्याचा अर्थ लावून धम्म प्रचार करताना दिसतात पण बुद्धाच्या “आर्य अष्टांगिक मार्गा”चा उद्देश जगाची पुनर्रचना करण्याचा आहे. त्यासाठी भिक्षु “प्रज्ञा-शील-समाधी” तून कोणता बोध देतात? ज्या “प्रज्ञा- शील- समाधी”च्या विचारात “सम्यक” शब्दालाच वजा केल्या जात असेल त्याचा अर्थ धम्माभिप्रेत, धम्माच्या उद्देशाला पूरक सांगितला जात आहे, असे कसे म्हणता येईल? “अत्त दीपो भव” यांचा अर्थ “स्वयं प्रकाशित व्हा”. “स्वतःच्या दीपक स्वताच बना,” असा सांगितला जातो. याचा दुसरा अर्थ हा होतो कि दुसऱ्याचे ऐकू नका, मानु नका. वनस्पतींना आपण स्वयंपोशी म्हणतो तरी त्यांचा आधार सूर्य, पाणी, जमीन व हवा आहे कि नाही? स्वयंपूर्ण कोण ते मानव आहेत? मानव वनस्पतींवर व प्राण्यांवर अवलंबून आहेत. ते मानवांच्या पूर्व बुद्धीवर अवलंबून आहे. ते स्वयंपूर्ण कसे असू शकतात? बुद्धाने कोणालाही “सर्वज्ञ” समजले नाही, याचा अर्थ कितीदाही “अत्त-दीपो-भव” म्हणत गेले तरी बुद्धितील अंधार घालवता येणार नाही. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नव्हता व नाही. म्हणूनच तो एकाकी जीवन जगण्याऐवजी समाज, समूह करून राहतो. दुसऱ्याचा जळत्या दिव्याच्या ज्योतीचा आधार घेवून आपली ज्योत पेटविली जात असेल तर त्याला “अत्त-दीपो-भव” कसे म्हणता येईल? ‘या आणि पहा, आपल्या डोळ्यांनी पहा, काय पहा? स्वतः अनुभव घ्या.’ कसला अनुभव? अनुभवण्याचा उद्देश काय? श्वास शरीरात जात आहे व येत आहे, हे प्रत्यक्ष विपस्सना, ध्यान, झेनाचे नियम पाळून अनुभवा. असा प्रचार हजारो वर्षापासून चालू आहे पण त्याचा जग बदल साठी फायदा झाला का? हा अनुभव ब्रम्हदेशातील महायानी भिक्षु-भिक्षूंनी हजारो वर्षापासून घेतला तरी आज त्यांना रस्त्यावर उतरून मोर्चा का काढावा लागतो? त्यांच्यावर लाठीचार हल्ला होतो? त्यांच्या हातात बेड्या घालून त्यांची मारहाण का होत आहे? महायानी “अत्त-दीपो-भव” च्या विचारांनी कोणत्या उद्दिष्टाला गाठले आहे? भगवान कोणाला म्हणावे? बुद्धाला “भगवंत” व “भगवान” म्हणणे म्हणजे सुद्धा मूर्खपणा आहे. हे शब्द महावीराना, रामाला, कृष्णाला सुद्धा वापरले जातात. त्याच अर्थाने बुद्धाला सुद्धा वापरतात. भगवान म्हणजे काय? भग म्हणजे भोक व वान म्हणजे शरीर, रूप, काया. भोकातून निघालेली काया म्हणजे भगवान. कोणता आदर्श यात दडला आहे? काही भिक्षु म्हणतात संपूर्ण तृष्णेला परतवून लावणे, त्यागणे, सोडणे म्हणजे भगवान. भग म्हणजे भागवून, परतवून लावणे आणि वान म्हणजे वांट (want). वांट म्हणजे इच्छा, तृष्णा. संपूर्ण तृष्णा त्याग म्हणजे भगवान. भगवान चा तर्क चुकीच्या कसा आहे? “वान” म्हणजे इंग्रजीतील “want” कसा होतो? भगवान मधील “भग”चा मराठी अर्थ आणि “वान” चा इंग्रजी अर्थ घेवून “भगवान” चे समर्थन कशासाठी हवे? भगवान जर आदरवाचक शब्द असेल तर “भगवान बुद्ध” का म्हणावे? बुद्धाला भगवान म्हणून त्यांना “परमात्मा” बनवण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना आदरच द्यायचा आहे तर बुद्धाच्या नावाआधी महामानव, श्री. श्रीमान, जी, आदरणीय, किंवा माननीय का लावले जात नाही? जे शब्द हिंदू लोक राम, कृष्ण, शिव, शंकर, विष्णू, रजनीश इत्यादी ईश्वरांच्या नावासमोर लावतात त्या शब्दाला बुद्धाच्या पुढे का लावण्यात येत आहे? जर हा शब्द एवढा आदरवाचक होता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “द बुद्ध अंड हिज धम्म” या महान ग्रंथात “द” ऐवजी ते “भगवान” असे शीर्षक का करू शकले नाहीत? मात्र एका प्रसिद्ध भिक्षूने त्या ग्रंथाचे हिंदी अनुवाद करतांना “भगवान बुद्ध और उनका धर्म” असा करण्यात आला. भिक्षु कोणत्या विचारांचे आहेत, बुद्धाच्या कि हिंदूंच्या? पालीतील “भगवंतु,” “भगवा” म्हणजे “भगवान” नाही. संस्कृत भाषेतील “भगवान” शब्दाची ही उचलेगीरी नसेल का? अनीश्वरवादी धम्माला ईश्वरवादी बनवून संपवण्याचा हा कुटील डाव आहे. (बुद्ध धम्म : भ्रांतिनिवारण, लेखक- डॉ. सुरेंद्र अज्ञात, बुद्धिष्ट पब्लिकेशन हाउस) भगवान हा भारतीय भाषेतील शब्द आहे तेव्हा त्याचा अर्थ लावतांना त्यातील काही शब्दांनाच इंग्रजी अर्थ लावून नंतर त्याचे भारतीय अर्थात रुपांतर करण्याचा आटापिटा भिक्षु का करतात? कारण त्यांना धम्मात अंध:श्रद्धा पसरवायची आहे. त्यामुळे धम्म लयास गेला तरी त्याची त्यांना फिकीर नाही, फक्त भिक्षूंची भिक्षुकी चालली म्हणजे झाले. ह्या अतार्किक विचारांनाच बुद्धाने अज्ञान म्हटले आहे. ज्ञानाला विज्ञानी बनविण्यासाठी तर्कज्ञान षडायतनाने घ्यावे लागेल. ‘भगवंत’ आणि ‘भगवान’ ह्या शब्दांला बुद्धाच्या वैज्ञानिक धम्मात मुळीच वाव देवू नये. अन्यथा “बुद्ध देवा” तुझी ज्ञानगंगा सुरु होईल व हिंदू व बौद्ध धम्मात अंतर राहणार नाही, धम्म समजवायला कठीण जाईल. समजावता येणार नाही आणि धम्माचा लोप होईल, पाली सुत्तातले भगवत्तो म्हणजे भगवान नव्हे, तर भगवे वस्त्र, चिवरधारी बुद्ध असा आहे. ही उचलेगिरी महायानी भिक्षूंची ही उचलेगिरी केव्हापर्यंत चालवायची? याला विज्ञान म्हणावे कि अज्ञान? भिक्षूंच्या फालतू व अवैज्ञानिक विचारांची चौकशी झालीच पाहिजे. गुरु-शिष्य परंपरेतून अनेक वाईट, अवैज्ञातून विचार बौद्ध धम्मातील त्रिपिटकात समाविष्ट आहेत. त्याचा आधार घेवून “द बुद्ध अंड हिज धम्म” हा ग्रंथ निर्माण झाला. ज्याचे आधारच गुरु शिष्य परंपरेतील आहेत, त्या ग्रंथाला “बहुजन हिताय- बहुजन सुखाय” ग्रंथ म्हणता येईल का? त्रिपिटक हे धम्माचे संशोधित विचार दाखविणारे ग्रंथ नाहीत. गुरु-शिष्य परंपरेत शिष्य नेहमी गुरूच्या विचारांचा आदर करतो. त्याने खोटेही विचार सांगितले तरी तो त्यावर प्रश्न करीत नाही. आज बाबासाहेब आंबेडकर हे आमचे केवळ पिताच राहिले नाहीत तर गुरु सुद्धा बनले आहेत. त्यांना अंध:भक्त नको होते. पण आज त्यांच्या धम्मात डोळस किती आहेत? त्यांनी जे शिकविले ते आपण डोळे झाकून स्वीकारले? याला विज्ञान म्हणावे का? जे स्वीकारले ते समझले कि नाही हा गौण प्रश्न. जे स्वीकारले ते समझले नसेल अशांना इतरांना समजावण्याची जबाबदारी दिली जात असेल तर समझवतांना तो काय समझवणार? आणि ऐकणाऱ्याला धम्म कसा व कोणता समझला असेल? याची आपण कधी परीक्षा घेतली का? |
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें