
देव, आत्मा, देऊळ, पूजा, स्वर्ग हे लोकांच्या, भक्तांच्या शोषणाची साधने आहेत. भक्तांनी त्याचा मोह सोडला तर ते तर्कवादी होतील व देव, धर्माच्या पुरोहिती जाळ्यात ते सापडणार नाहीत. ते स्वार्थी लोकांच्या शोषणापासून स्वतःचे रक्षण करतील, अशी समज बाबासाहेबांची होती. हिच समज बुद्धाचीही होती. म्हणून बुद्ध-आंबेडकर या दोघांच्या विचारात फारच साम्य असल्यामुळे ते एकजीव, एकत्रित झालेत. बुद्धाच्या मार्गाला बाबासाहेबांनी धर्म वा रिलीजन मानले नाही. कारण बुद्ध विचारात धर्मातील ईश्वर, आत्मा, पूजापाठ, स्वर्ग-नरक, नसीब यापैकी काहीही नाही. बौद्ध साहित्याचा अभ्यास केल्यावर हिंदू धर्मापासून बुद्ध विचार भिन्न, वैज्ञानिक, क्रांतिकारी व कल्याणकारी लोकशाहीवादी असल्यामुळे बाबासाहेब बुद्धाला शरण गेले, बुद्धाच्या जवळ गेले. बुद्धाच्या विज्ञानवादी विचारांमुळे त्यांनी धम्माचा मार्ग लोकांना सांगितला.
नागपूरला पत्रकारांशी चर्चा करतांना “मी आता बौद्ध झालो असल्यामुळे जातीवर आधारित कोणत्याही संघटनेचा सभासद म्हणून कार्य करणार नाही, कारण बौद्ध धम्मात जाती नाहीत.” असा संदेश दिला होता पण १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरी आंदोलनाचे नाव घेत जातीवादी नाव धारण करून “जाती तोडण्याऐवजी जोडण्याच्या” कार्याला लागल्या. केवळ राजकीय फायद्यासाठी धम्म तत्वाची होळी करायची का? धम्मापेक्षा राजकारण मोठे का? जाती जोडण्यातून धम्म विचारांशी विसंगत विविध जातीवादी लोकांना बुद्धाच्या पंगतीत बसविण्यात आले, ते आंबेडकरी जनतेने कसे मुग गिळून सहन केले हेच आता समजत नाही. हे त्यांच्या जागृतपणाचे लक्षण आहे का? हा भारतीय बौद्धांपुढे फार मोठा प्रश्न आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर करवी “धम्मदीक्षा” घेवून आज ५6 वर्षे पूर्ण उलटली पण भारत देशाला धम्ममय का करू शकलो नाही? हा एक फार चिंतेचा प्रश्न आहे. बुद्धाची धम्मक्रांती विफल का झाली? व तिला सफल बनविण्यासाठी काय केले पाहिजे? ते लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. धम्म म्हणजे निश्चित कोणते विचार? ते स्पष्ट नसणे.
२. भिक्षुंकडून भेसळयुक्त विचारांचा सतत प्रसार होने.
३. प्रतिगामी महायानी विचारांचा महास्थविर संघरक्षित, ओशो राजनिश, सत्यनारायण गोएनका यांचा वाढता प्रभाव.
४. परंपरागत धम्म विचारांनी युक्त परदेशी जापानी भन्ते सुरई ससाई, संघरत्न माणकेचे अवास्तव अनुकरण करणे.
५. आदर्श लोकशाही म्हणजे धम्म कसा? जातिगत आरक्षणालाच प्रगतीकारक धम्म समजू लागले.
६. क्षुल्लक आर्थिक जातिगत आरक्षणाला धरून जाती व्यवस्थेने जतन करण्यात आंबेडकरी जनता मग्न झाली.
७. केवळ १०% लोकांनाच फायदेशीर असणाऱ्या जातिगत आरक्षणाला टिकविण्यासाठी अवास्तव महत्व देणे.
८. कार्यकर्त्यांना पोटार्थी समजून त्यांचा अपमान, भ्रमित विचारांचा प्रसार करणाऱ्या भिक्षुंना सन्मान देण्यात देणे.
९. धम्माला वैज्ञानिक आदर्श लोकशाहीला पूरक अशा विचारांवर नवीन मांडणी केल्या गेली नाही.
१०. धम्माला सोपी, वैज्ञानिक व व्यवहारिक करण्याची गरज लक्षात घेतल्या गेली नाही.
११. भिक्षूंचा धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म नाही तरीही त्याचा पाठलाग करण्यात आला.
१२. या कारणांमुळे भारतच कशाला, केवळ नागपुरातील लोकांना सुद्धा धम्ममय करता आले नाही.
धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक १५ आक्टोंबर १९५६ ला दिक्षभूमी, नागपूर येथील भाषणात बाबासाहेबांनी कळकळीची सूचना केली. ती प्रबुद्ध भारत या ठिकाणी ठळक अक्षरात दि. २७ आक्टोंबर १९५६ ला प्रकाशित झाली. त्याकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष झाल्यामुळे धम्म प्रचाराचा रथ थांबला. त्याला जर प्रामाणिकपणे गतिमान करायचे असेल तर बाबासाहेबांची ती सूचना सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे हि, “तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे..... नाहीतर महार लोकांनी धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये. म्हणून आपण निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, ईतकेच नव्हेतर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. “आपापल्या प्राप्तीचा २० वा हिस्सा या कामी देईन असा, निश्चय करावा........ समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे मी जाहीर करतो.” जे समाजकार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” म्हटले आहे. ते म्हणतात, “समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात....बाकीचे सार्वजन शेणातील किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.” (बामसेफच्या आंबेडकरद्रोही भूमिकेची छाननी, एस. डी. भवार, पृष्ठ-२०२) अशा माणसांना ‘तू शेणातल्या किड्याप्रमाणे जीवन जगतोस’ याची जाणीव करून देणे, हे प्रत्येक सुशिक्षितांचे कर्तव्य आहे.
सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म हा वर्ण विरोधी, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, मानवात न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुभावाची लोकशाही मुल्ये शिकविणारा आहे. जगात वैज्ञानिक लोकशाही विचारांवर अधिष्ठित राज्य चालावे. ते लोकांनी, लोकांच्या स्पर्धेतून नव्हे करता तर “लोक सहयोगातून वैचारिक परिवर्तन” घडवून आणावे, अशी बुद्धाची इच्छा होती. संपत्तीची अमर्याद मालकी त्यांना नको होती तसेच संमतीच्या साधनांचा त्यांना हव्यासही नको होता.
मानवी सुखापुढे संपत्ती गौण, शून्य आहेत. म्हणूनच संपत्तीचा अवास्तव, असीमित मोह त्यांनी टाळला. बुद्धाचा सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे “सम्यक मार्ग” होय, तो वैज्ञानिक, आदर्श लोकशाही युक्त, धर्मनिरपेक्ष आणि परस्परात सौख्य निर्माण करणारा आहे. त्यामुळेच विश्वातील सर्व जनता सुखी होती. धम्मदीक्षितांनी “वैज्ञानिक धम्म” सतत पाळून व त्याचा प्रचार-प्रसार करून विश्वात धम्म राज्य निर्माण करावे तरच बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेला खरा अर्थ प्राप्त होईल. महामानव गौतम बुद्धाच्या धम्माला “सम्यक दृष्टी” म्हणजे “वैज्ञानिक दृष्टी” समजून “जगाची पुनर्रचना” करण्याची कधी नव्हती एवढी आज नितांत गरज आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें