सोमवार, 25 मई 2020

आंबेडकरी जनतेवर महायानी प्रभाव



                 गौतम बुद्धाचे विचार जगातील अनेक देशात वास करीत आहेत, असे अनेक विचारवंताचे मत आहे. परंतु बुद्धाचे नेमके विचार कोणते? ह्या बाबद मतभेद आहेत. महायान व हीनयान या मुख्य दोन संप्रदायांची विचारधारा जगात प्रसिद्ध आहे. या दोन पैकी कोणत्याही संप्रदायांचे समर्थन बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. पण याच संप्रदायांचे भिक्खू भारतात वावरत आहेत. त्यांनी बुद्धगया येथे आपले कार्यालये उभी केलेली आहेत. या कार्यालयाच्या अंतर्गत भारतात ते आप-आपल्या संप्रदायांचा प्रचार करीत आहेत. या भिक्षूंचे प्रमुख लक्ष्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाराष्ट्रातील लोकांना धम्म दीक्षा देवून बौद्ध बनविले आले. त्यांना भ्रमित करून आपल्याकडे ओढण्याचे कार्य चालू आहे.
                बौद्ध संप्रदायांच्या माध्यमातूनच त्रि-पिठ्कांची निर्मिती. या भेसळयुक्त मतांच्या ग्रंथांचा पुरावा देवून ते अनीश्वरवादी बुद्धाला ईश्वरवादी अर्थात “भगवान” बनविले. ज्याप्रमाणे हिंदू व इतर धर्माचे लोक ईश्वराची पूजा करून आशीर्वाद मिळवितात तसाच हा प्रकार आहे. या याचे समर्थन करतांना “त्रैलोक्य बौद्ध महासंघा”च्या महायानी महास्थवीर संघरक्षित यांनी “भगवान” या शब्दाची व्याख्या बनविली. त्यांच्या मते “भग = भागवणे” आणि “वान = Want = इच्छा, तृष्णा”. ज्यांनी तृष्णेचा, इच्छेचा समूळ नाईनाट केला तो “भगवान”. यांत प्रश्न येतो कि मराठी, हिंदी, संस्कृत व पाली भाषेत तरी “वान = ईच्छा, तृष्णा” असा अर्थ नाही. जर तसा अर्थ नसेल तर बुद्धाला अलौकिक, दैवी, देवासारखा वा त्यापेक्षा ही महान बनविण्याच्या नादात बुद्ध धम्मात “भगवान” अवतरला.
              दुसरा प्रश्न हा निर्माण होतो कि कोणता ही जिवंत व्यक्ती आपल्या संपूर्ण इच्छेचा नाईनाट करू शकतो का? इच्छा ह्या शारीरिक व मानसिक प्रकारच्या आहेत. त्या परस्परावलंबी आहेत. शरीराच्या ईच्छा मारल्या, संपवल्या तर मनाच्याही ईच्छा संपतात आणि मनाच्या इच्छा संपवल्या तर शरीराच्याही ईच्छा संपतात. कोणताही व्यक्ती जिवंतपणी आपल्या संपूर्ण इच्छेचा त्याग, अंत करू शकत नाही. यात त्यांना जिवंत बुद्ध हवा कि मृत हे कळायला मार्ग नाही. एखाद्या व्यक्तीला एवढे मोठे करण्याच्या नादात त्यांनी बुद्धाच्या वैज्ञानिक विचारांची ही तमा बाळगलेली दिसत नाही.
              महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या राखेला पवित्रतेचा मुलामा लावून त्यावर थडगे उभारले, त्याची पूजा करायला सुरुवात केली आणि कालांतराने बुद्धाच्या मुर्त्या बनवून त्यांची “पूजा” सुरु केली. बुद्धाची व त्यांच्या अस्थींची पूजा करणाऱ्या बौद्धांची परंपरा सुरु झाली. आज दोन्ही संप्रदायांच्या लोकांनी “पूजे”चा अंगीकार आणि प्रचार-प्रसार सुरु केला आहे. त्यातून “बौद्ध पूजा पाठ” नावांच्या भाकड परंपरेची निर्मिती झाली. आज वैज्ञानिक युगात “परित्राण सूत्र पूजापाठा”चा पांढरा धागा, दोरा आंबेडकरी बौद्धांचे रक्षण करीत आहे ! किती ही अदभूत विचारसरणी आहे जिला परंपरेच्या नावाने स्वीकारले जात आहे. ह्या आंधळ्या परंपरेला आजचा वैज्ञानिक वर्ग अंगीकार करतांना दिसतो तेव्हा त्यांच्या वैज्ञानिक धम्माची कीव येते.
               गौतम बुद्धाने “अनात्म”वादाचा सिद्धांत मांडून हे सिद्ध केले कि जगात “आत्मा” नाही. तरीही जबरदस्तीने महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या पूर्वजन्माच्या जन्मकथा, जातककथा रचल्या. पूर्वजन्मात चांगले कार्य केले असेल म्हणून तो या जन्मात सुख उपभोगतो व या जन्मात जो चांगले कार्य करील तो येणाऱ्या जन्मात सुखी होईल त्याच प्रमाणे जो या जन्मात “बोधिसत्व” आहे तो पुढील जन्मी “बुद्ध” होईल. या काल्पनिक विचारांचा परिणाम म्हणजे तिबेट “लामा” (बोधिसत्व) पद्धती.
              बुद्ध होण्यासाठी प्रथम “बोधिसत्व” होणे आवश्यक आहे म्हणजे जो पूर्व जन्मी बोधिसत्व असेल तोच “बुद्ध” होऊ शकतो. बोधिसत्व होण्यासाठी “दहा पारमिता”चे आजन्म पालन करावे लागते असा महायानी समज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या दहा पारामितांचे जीवनभर पालन केले आहे याचा शोध या महायानी भिक्षूंनी १४ आक्टोंबर ते ६ डिसेंबर १९५६ ला केवळ दोन महिन्यात लावला. त्याच शोधाच्या आधारे महायानी भिक्षु बाबासाहेबांना “बोधिसत्व” म्हणायला लागले. ज्या बाबासाहेबांनी आत्म्याचा पुनर्जन्म नाकारला त्यांच्या नावासमोर आत्मवादी संकल्पनेचा पुरस्कार करणारा शब्द लावून त्यांना “हिंदू” बनवून सोडले.
              बाबासाहेब आंबेडकर मरण पावले ही बातमी जगाच्या काना-कोपऱ्यात वाऱ्याच्या गतीने पसरली. लोक मुंबईत जमत होती. त्यात महायानी “भदन्त आनंद कौसल्यायन” सुद्धा होते. पाहता पाहता लाखोंची गर्दी जमत होती. हिंदूंच्या दहन घाटावर बाबासाहेबांच्या प्रेताला अग्नी देण्यात आली. त्यातून उरलेल्या राखेवर थडगे उभारले. त्याला महायानी परंपरेत “चैत्य” म्हणतात. चैत्य म्हणजे चितेवर उभारलेली वास्तू, जिथे चेतनेचा अभाव असतो. ते ज्या ठिकाणी उभारले आहेत त्या ठिकाणाला “चैत्यभूमी” (मुर्दा घाट) संबोधल्या जात आहे. तिथे बौद्ध उपासक दरवर्षी मोठ्यासंख्येने जमतात. हा प्रकार अवैज्ञानिक, विचार विरोधक, व्यक्तिवादी आहे.
              देवी-देवतांच्या मुर्त्या सुद्धा स्मारकाचेच कार्य करतात. मेलेल्या माणसात दैवत्व शोधून “घे भीमा, जन्म तू, पुन्हा-पुन्हा” म्हणत असतात. हि भावना काय दर्शविते? जागोजागी मेलेल्या लोकांची थडगे यांना “स्मारक” समजून पूजण्याची परंपरा चालू आहे. ही उपासना मागील हजारो वर्षापासून सुरु असून सुद्धा जगातील ९०% मानव समूह दु:खी का? आपण थडग्याच्या उपासनेतून आजवर काय कमावले?
             कार्ल मार्क्स हे धर्माला “अफू”ची गोळी समजत होते, ते काही मजाक म्हणून नव्हे. भारतीय महायानी बौद्ध भिक्षु सुद्धा भारतात “अफू”ची पेरणी करण्यात मागे नाहीत, मग ती जमिन बुद्धाची असो कि “बाबासाहेबाची.” त्याचा परिणाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या “THE BUDDHA AND HIS DHAMMA” या ग्रंथाचे “भगवान बुद्ध और उनका धर्म” असे चुकीचे हिंदी भाषांतर आहे.
             बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. कार्ल मार्क्सचा “दास कॅपिटल” त्यांनी वाचला नसेल असे होवूच शकत नाही. म्हणूनच हिंदू धर्म सोडण्याआधी त्यांनी आपल्या ग्रंथात बुद्धाच्या विचारांना “धर्म” म्हणून स्वीकारण्या ऐवजी “धम्म” म्हणून स्वीकारले. धर्मात असलेला अवैज्ञानिक विचार त्यांनी काढून फेकण्यासाठी ईश्वर-आत्मा मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही असी सामान्य जनतेला प्रतिज्ञा दिली. लोकांनी ती ऐकली आणि दुसऱ्या कानातून सोडून दिली.
              सामान्य भारतीय जनता बुद्ध-भीम “वंदने”च्या माध्यमातून दु:खीतांचे दु:ख हरण करण्यासाठी वाट पाहत आहेत. ही वैज्ञानिक धम्माची अवैज्ञानिक दुरावस्था महायानी भिखुंच्या सानिन्ध्यातून आंबेडकरी बौद्धांना प्राप्त झाली आहे. व्यक्तिवादी बनण्याऐवजी विचारवादी व केवळ विचारवादी बनण्यापेक्षा कर्तुत्ववादी बनणे अधिक फायदेशीर आहे. शेवटी “हफीज जालंधरी”च्या शब्दांत म्हणावेसे वाटते, ”गल्त समझे यह बुद्धिमान गौतन की बसारत को, बलाए-बुत-प्रस्तीने बर्बाद किया भारत को.”

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें