धम्म म्हणजे "आदर्श लोकशाही" आहे तर न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांची संयुक्त जोपासना म्हणजे धम्म होय. ज्याप्रमाणे सम्यक दृष्टी वर सम्यक संकल्प, सम्यक संकल्पावर सम्यक वाचा, सम्यक वाचेवर सम्यक कर्म, सम्यक कर्मावर सम्यक आजीविका, सम्यक आजीविकेवर सम्यक प्रयत्न, सम्यक प्रयत्नावर सम्यक स्मृती आणि सम्यक स्मृतीवर सम्यक समाधी निर्भर आहे. त्याच प्रमाणे न्यायावर स्वातंत्र्य, स्वातंत्र्यावर समता, समतेवर बंधुभाव आणि बंधुत्वावर विश्व अधिष्ठित आहे. दिनांक ३ आक्टोंबर १९५४ रोजी दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण प्रसारित झाले त्यात त्यांनी या विषयावर भरपूर प्रकाश टाकला तो असा, “स्वातंत्र्य, समता आणि सहभाव हे नैतिक मूल्य फ्रेंच राज्य क्रांतीपासून उसने घेतले नसून ते माझे जीवन विषयक तत्वज्ञान मी माझे गुरु गौतम बुद्धा पासून घेतले आहे. माझ्या तत्वज्ञानाचे मुळ राजकारणात नसून धम्मात आहे. माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक असते...
“माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे, तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वतात्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून स्वरक्षण मिळावे म्हणूनच कायदे-कानुनचे स्थान गृहीत धरलेले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या भंगाबाबद कायदा खात्रीने मदत करू शकेल यात मला विश्वास वाटत नाही. मी बंधुत्वाला सर्वोच्च स्थान देवू इच्छितो कारण स्वतंत्रता आणि समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंदुभावाचे दुसरे नाव आहे. आणि बंधुभाव आठव मानभाव हे धम्माचे दुसरे नाव आहे...
“कायदा व सह्भावाचे मूल्यमापन करतांना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. या उलट सहभाव अथवा धम्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्याकाचे कर्त्यव्य गणले जाते...राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व सहभाव या जीवन मूल्यांना मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित हिंदू सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे हि तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझा माझ्या जीवन विषयक तत्वज्ञानावर पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा तो राजकीय ध्येयवाद बनला आहे. तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल, अशी मला उमेद आहे.” (मुक्तछंद, सन- १९७६) धम्मातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा अतिरेक, कमी व अधिक टोके टाळण्यासाठी तो सम्यक, मध्यम, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श, आचरणशील, सर्वांगीण व सर्वांना कल्याणकारी अशा लोकशाही तत्वावर, विचारांवर उभा आहे...
प्राचीन भारतीय इतिहासाला राजकीय अंग कसे होते? ते सांगताना दिनांक २४ सप्टेम्बर १९४४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मद्रासच्या ‘प्रभात’ टॉकीजमध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “जगात कुठल्याही देशात प्राचीन हिंदुस्थान सारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बदुधा एकाच देश असा आहे कि, जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती.....बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दांत सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाल्यास कुन्या अधिकाऱ्याने सांगितलेली गोष्टच सत्य, असे नाही. उलट ब्राम्हणांचे म्हणणे असे कि, जे वेदाप्रमाणे आहे तेच सत्य (हास्य). बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राम्हण प्रतिगामी. जर ईस्लाम धर्माने ह्या देशात पाहुल टाकले नसते तर आणखी काही काल हा ब्राम्हण बौद्धातला लढा चालला असता. जगाच्या इतिहासात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदेश देणारे ‘बुद्ध’ हेच पहिले व्यक्ती असतील......धर्म, अर्थ, संस्कृती व राजकारण एकात जुंपून चालणारी चातुर्वण्य व्यवस्था ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली.”
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या चार लोकशाही मुल्यांवर तत्वावर धम्म अधिष्ठित आहे. बुद्धाने भिक्षु संघ ही सम्यक, नैतिक मूल्यावर विनय नियमांची निर्मिती केली. संघात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युन” मध्ये आणि भिक्षूच्या “संघा” मध्ये फरक तो हाच आहे. भिक्षुसंघ लोकशाही विचारांवर तर साम्यवादी “कम्युन” हा शोषित कामगारांच्या हुकुमशाहीवर अधिष्ठित आहे. म्हणूनच धम्मापेक्षा साम्यवाद महान नाही, तर तो लहान आहे. कारण ‘कम्युन’ द्वेषावर तर धम्म प्रेमावर अधिष्ठित आहे. द्वेषाचे आयुष्य कमी तर प्रेमाचे आयुष्य जास्त असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’च्या, खंड आठव्यातील, भाग तीन मध्ये, बुद्धाचा “सम्यकवाद” "कार्यकारण" सिद्धांतात मांडला, तो बघूया.
१. तृष्णे मुळे लाभाची ओढ होते.
२. लाभा मुळे कामवासना निर्माण होते.
३. कामवासने मुळे लालसा निर्माण होते.
४. लालसे मुळे दृढता (हाव) निर्माण होते.
५. दृढते मुळे स्वामित्व (स्वार्थ) निर्माण होते.
६. स्वमित्वा मुळे (अमर्याद) लोभ निर्माण होते.
७. लोभा मुळे अधिक स्वामित्व (आसक्ती) निर्माण होते.
८. स्वमित्वा मुळे संपत्तीवर पहारा (कुंपण) होतो.
९. पहाऱ्या मुळे संघर्ष (झगडा) निर्माण होतो.
१०. संघर्षा मुळे निंदा (अपमान) निर्माण होते.
११. निंदे मुळे असत्य (खोटेपणा) बाहेर येते.
१२. असत्य बाहेर आल्यामुळे दुःख (पश्चाताप) निर्माण होते.
ही प्रतीत्यसमुत्पादाची अनुलोम साखळी आहे. मज्जीम निकायातील “चुलसकुलदायि सुत्तात” प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धांत आहे. “इमस्मिम सती ईदं होती.” (ह्या च्या होण्याने हे होते.) “इमस्मिम असती ईदं न होती.” (ह्या च्या नसल्याने हे होत नाही.) “इमस्य विरोध ईदं निरुज्झती.” ('ह्या' च्या विरोधाने 'त्याचा' विरोध होतो.) कोणताही संस्कारित पदार्थ नित्य, अशाश्वत नाही तर तो अनित्य आहे, क्षणिक आहे. कार्य पदार्थाच्या कार्यकारण सिद्धांतामुळे होते. प्रतीत्यसमुत्पादाला “मध्यम वर्ग” सुद्धा म्हणतात. प्रत्येयामुळे उत्पन्न (उत्पाद) नव्हे तर ‘परिवर्तन’, अनित्य होते. प्रतीत्यसमुत्पाद हा शब्द भिक्षूंची देन आहे, त्यामुळे इथे तो शब्द महत्वाचा नसून त्याचा अर्थ “ह्या मुळे हे होते” ते होतच राहते, हा ‘अनित्य बोध’ महत्वाचा आहे.
ब्राम्हणवादी व मार्क्सवादी विचारांचे लोक समाजावर हुकुमशाही लादत असतील तर त्याचा विरोध करावा, हा बाबासाहेबांचा संदेश होता. त्याचप्रमाणे जातीच्या नावावर महारांनी मांगांवर, चमारांणी महार जातीवर व इतर जातीवर सुद्धा हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करू नये. असे बाबासाहेबांचे स्पष्ट विचार होते. जाती, धर्म व वर्ग विचारी लोक मूर्खच नव्हे त्यातील बरेच लोक अज्ञानी, तानाशाही, हुकुमशाही वृत्तीचे असतात. त्यात फारच कमी लोक ज्ञानी व लोकशाही विचारांचे असतात. कोणताही वर्ग बौद्धिक दृष्ट्या परिपूर्ण, स्वच्छ नाही म्हणून जाती, वर्ग, वर्ण व धर्म या विषयांवर भांडत बसने, त्यांचा मनात गर्व बाळगणे, ते सोडणे आवश्यक आहे. तरच धम्मातील नैतीकेची शिकवण आपल्या आचरणात येईल. त्यातूनच आपल्या संघटना, संस्था मजबूत होतील, व उद्देशपूर्ती होईल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें