डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हटल्या गेले आहेत ते स्विकारतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे......जी गोष्ट तर्कसंगत आहे, ते बुद्धवचन होय.” (बुद्द आणि त्यांचा धम्म, खंड चवथा) विज्ञान म्हणजे तर्कसंगत विचार. गुढ ज्ञान म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे कार्यकारणभावाचा अभाव. कारणाशिवाय कार्य असंभव आहे. कारण नसेल तर कार्य घडूच शकत नाही. कार्य हे नेहमी कारणांच्या सामुहिक प्रयत्नातूनच उद्भवतात. कोणत्याही एका कारणाने कार्य घडत नाही. कार्य-कारण हे अनित्य, परिवर्तनशील वैज्ञानिक विचारधारा आहे. ईश्वर व आत्मा असल्याची का करणे तर्कसंगत नाहीत म्हणून ते अज्ञान या व्याख्येत मोडतात.
स्वार्थी लोकांनी अज्ञानाला सोबत घेवून सामान्य लोकांची हजारो वर्षांपासून दिशाभूल, लुबाडणूक केली. त्यातून वाचायचे असेल तर विज्ञानाचा आधार घेणे फार गरजेचे आहे. विज्ञान हे केवळ प्रायोगिकच असते असे नाही तर ते प्रगतीकारक वैज्ञानिक दृष्टीकोन दर्शक हा आहे. त्यातून मानवी जीवनासाठी आशावाद उभा राहतो. विज्ञान म्हणजे कल्याणकारी आशा होय. ती निराशेपासून व्यक्तीला, समाजाला देशाला, जगाला वाचवीत असते. ती जीवनाला सुखकर बनवते व दु:खात मदतीला येते. विज्ञान हे केवळ भौतिक असते असे नव्हे तर ते मानसिक सुद्धा असते. आदरणीय महामानव बुद्ध हे जगातील सर्वात मोठे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. मन आणि त्याचे व्यापार त्यांनी ओळखून त्यापासून आपली वर्तणूक कशी करावी म्हणजे नुकसान होणार नाही, याचे पदोपदी त्यांनी आयुष्यभर प्रबोधन केले. ते तथ्यातून सत्य शोधणारे असल्यामुळे तथागत म्हणून प्रसिद्ध पावले.
बुद्धधम्माच्या नावावर कोणत्या अज्ञानाचा बौद्ध भिक्षूंनी प्रचार-प्रसार केला व त्याचे समाज जीववनावर कोणकोणते बरे-वाईट परिणाम झाले? ते तपासणे धम्म प्रचाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महायानी भिक्षुरचित त्रिपिटकाचा फार प्रभाव होता. त्यातून त्यांची भाषणे आणि वाङमय उदयास आले. त्याचा समाजावर कसा परिणाम झाला. सध्या पंचशील या विचाराचे संशोधन करणे फार गरजेचे आहे. अलीकडे भिक्षूंच्या माध्यमातून उपासकांना “पंचशील म्हणजे धम्म” अशी शिकवण दिली जात आहे. जर उपासक पंचशिलेचे पालन करीत नसेल तर तो धम्माचे पालन करीत नाही अशी अफवा भिक्षु लोक करीत आहेत. पंचशील हे महायानी संप्रदायातील भिक्षूंची देन आहे. त्रीपिटकातील खुद्दक निकायातील “खुद्दक पिटकात” त्याचा उल्लेख आहे. आता प्रश्न हा येतो कि, बुद्धाने त्रिपिटक लिहिले का? त्रिपिटक म्हणजे भिक्षूंनी वेळोवेळी तयार केलेल्या पुस्तकांचे तीन पेठारे होत. ह्या तील सर्वच विचार प्रामाणिक आणि बुद्धिवादी दृष्टीनेच लिहिले आहेत ते कशावरून समजावे?
पंचशील ज्या निकायात आले आहे ते निकाय पाचवे आहे. प्रथम चार निकाय जुने मानले जातात आणि हे पाचवे निकाय नंतरचे आहे. महायान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदुधर्माची झेरॉक्स आहे. त्यातून निघालेले तंत्रज्ञान, मन्त्रयान हे काय बुद्धधम्म सांगतात? बुद्ध म्हणतात, “जो धम्म दर्शन करतो तो माझे दर्शन करतो.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृष्ठ- ३३६, सम्यक प्रकाशन, नागपूर) तेव्हा त्रिशरण कशाला हवे? बुद्धा प्रमाणेच भिक्षुंना मान हवा म्हणून त्यांनी याला महत्व दिले पण धम्म न समजावता अभिवादन आणि मान कशाला हवा? पाचव्या निकायात धम्म तत्वज्ञान नसून महायानी (हिंदू) भिक्षूंची हुकुमशाही नियम आहेत. धम्माचे “आर्य अष्टांगिक मार्ग” हे प्रायोगिक तत्वज्ञान आहे, नियम नाहीत.
पंचशील हे तत्वज्ञान नाही तर नियम आहेत. हे नियम एवढे ताठर आहेत कि ते सर्व परिस्थितीत पाळले जाऊ शकत नाही, म्हणूनच जर्मनीच्या ‘बुद्धजन उपासक समिती’ने पंचशिलापैकी पहिले शील सोडून उर्वरित “चारच शील” पाळण्यात त्यांनी तयारी दाखविली होती. जे नियम लोकांकडून सहज पाळले जाणार नसतील ते नियम बुद्धाची शिकवण कशी असू शकते? जे विचार बुद्धाने आपल्या पहिल्या धम्मचक्रप्रवर्तन प्रवचनात दिले त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे पंचशील का? महायानच्या कठोर नियमांमुळे बुद्धधम्म आचरणात आणण्यास कठीण झाला. जो धम्म बोलल्या जातो पण आचरणात आणल्या जाऊ शकत नाही, असा कठोर विचार बुद्धाने लोकांना दिला होता का?
पंचशिलाचे पाच नियम म्हणजे १. प्राणीहत्या करणार नाही. २. चोरी करणार नाही. ३. खोटे बोलणार नाही, ४. कामवासनेच्या ईच्छे पासून दूर राहीन, ५. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहीन. (बुद्धाने एका राजाच्या कथेतून संपत्ती नाशाचे कारणे सांगितली ती म्हणजे रंडीबाजी, दारू, जुगार, कुसंगती तथा यज्ञ) बुद्धाच्या धम्मात संपत्तीला क्षुल्लक महत्व आहे तर बुद्धीला अफाट महत्व आहे. क्षुल्लक संपत्ती रक्षणासाठी बुद्धाने पंचशीलेला धम्म बनवले असेल का? बुद्ध धम्माचे विचार केवळ संपत्ती रक्षण करणारे टोकाचे विचार सांगण्यासाठी आहे कि, सर्वांगीण सुखाचा सम्यक मार्ग दाखवण्यासाठी आहेत? पंचशील व्यवहारिक आहेत का? प्राणीहत्या, चोरी, कामवासना, खोटे बोलणे व न नशेली पदार्थांशी मनापासून वैर करीन, अशी प्रतिज्ञा करण्याची गरज आहे का?
देवाच्या सामने अशा प्रतिज्ञा केल्या जातात. देव त्या ऐकतो व आपणास माफ करतो. मात्र ज्या धम्मात देवच नाही किंवा जो लोक ईश्वर मानत नाही त्यांनी ह्या प्रतिज्ञा का म्हणायच्या? पंचशील म्हणणारे लोक खरोखर पाच शीलाचे, नियमांचे पालन करीत आहेत का? या देशासाठी एक व दुसऱ्या देशासाठी दुसरा असे पंचशील बुद्धाला द्यायचे होते का? अदृश्य, सुक्ष्मप्राण्यांची व्यक्ती प्रेम करतो का? दही भात खाताना दहीतील सूक्ष्म प्राण्यांना पोटात मारले जाते, जमिनीवरून असंख्य सूक्ष्मजीव पायाखाली येतात आणि मरतात. हिंसा ही फक्त प्राण्यांचीच होते असे नाही तर वनस्पतींचीही हिंसा होते. व्यक्ती सर्वच दृश्य अदृश्य प्राण्यांशी मैत्री करू शकते का? जर तो मैत्री करू शकत नसेल तर त्यांनी खोटी प्रतिज्ञा का घ्यावी?
चोरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणारे लोक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसायातील नियम अधिक नफ्याचे वापरून ग्राहकांची फसवणूक करतात कि नाही? दुकानदाराला कमी दरात वस्तू विकत मागतांना दुकानदार म्हणतो ‘मला अधिक नफा नाही, थोडासाच आहे’ पण ती वस्तू केवढ्यात विकत आणली? त्याचा तो निश्चित आकडा सांगताना दुकानदार खरेच बोलतो का? खोटे बोलून ग्राहकांच्या खिशातील पैशाची चोरी व्यक्ती करतो कि नाही? बुद्धाच्या काळी व्यापार होत नव्हता का? व्यापारातून चोर वाटेने नफा कसा केला जातो? हे बुद्धाला माहित नव्हते का? मी चोरी करणार नाही म्हणजे सत्य सांगून नफा कमावेन, अशी प्रतिज्ञा करणारा वैश्य बौद्ध नव्हता का? मी काम वासनेतील खोटे आचार करणार नाही. यातील वासना ही बुद्ध धम्मात काया, वाचा आणि मनाची असते. बौद्ध लोक किती प्रमाणात कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त आहेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.
खोटे बोलणार नाही, याचा अर्थ खरेच बोलणार व्यापारी ग्राहकां सोबत खरेच बोलतो का? विदेशी चोरांना खरे बोलून रस्ता सांगायचा का? आपल्या आईने आपणास कसे निर्माण केले? ह्याचे आई-वडील मुलाला खरेच उत्तर देतात का? मी नशा करणार नाही, या नियमाचा विचार केला तर अति भोजन केल्यानेही नशा येतो तर भोजन घेवू नये का? आप्रेशन करण्याआधी डॉक्टर रोग्याला नशेचे इंजेक्शन, लस देतात, ती घेणे म्हणजे नशा करणे झालेच कि नाही? पंचशील हे आचरणाचे अव्यवहारिक नियम आहेत. जगातील कोणताही व्यक्तीकडून त्याचे पालन करणे असंभव आहे, हे सामान्य ज्ञान बुद्धाला कळत नव्हते, असे म्हणायचे का? जे नियम गृहस्थ पाळू शकत नाही हे लक्षात असतानाही त्याचे पालन करण्याकरिता बुद्धाने धम्मदीक्षा, संघदीक्षा दिल्या होत्या का? बुद्धाच्या काळी पंचशील म्हणजे पाच सुविचार होते. बुद्धाच्या आधीपासूनच ते प्रचलित होते. त्याला बुद्धाचा शोध म्हणायचे का?
बुद्धा आधीच जैन मुनींनी त्याचा “पाच बल” (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) म्हणून प्रचार केला. ती बुद्धाची शिकवण कशी? बुद्धाने दिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गा पेक्षा पंचशिलेचा मार्ग महान आहे का? कसा विचार करावा? कसा निर्धार करावा? कसे बोलावे? कसे करावे? कसे आचरण करावे? कशी सवय लावावी? कसे लक्षात ठेवावे? व कशाप्रकारे मन लावून कार्य करावे? याबाबद जे विचार सम्यक म्हणजे मध्यम, उचित, प्रसंगानुसार परिवर्तन करण्याचे स्वातंत्र्य देणारे मानायचे कि, “असे करू नका व असेच करा” ही टोके सांगणारा पंचशीलेचा मार्ग मोठा समजायचा? पंचशीलेतील नियम महायानी, हिंदू विचारांच्या भिक्षूंनी बुद्ध धम्मातील चांगले विचार लपवून ठेवण्यासाठी, चांगल्या विचाराला सह, बगल देण्यासाठी, तार्किक विचाराऐवजी तर्क विसंगत विचारांचा प्रसार करून लोकांना मूळ धम्म विचारांपासून दूर नेण्यासाठी धम्मात घातल्या गेलीत. बुद्धाने सारनाथ येथे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन प्रवचन समयी सुद्धा “आर्य अष्टांगिक मार्गा”लाच सुखाचा मार्ग म्हटले आणि शेवटीस मृत्युपूर्वी कुशिनारा येथे सुभद्र भिक्षुस “आर्य अष्टांगिक मार्ग”लाच कल्याण मार्ग म्हणजे धम्म म्हटले आहे.
ज्या वेळी बुद्ध हे धम्मप्रचार करीत होते तेव्हा सुद्धा त्यांनी उपासकांना "पंचशील" पालन करण्यावर जोर दिला होता का? पंचशील म्हणजे जैनांची पाच बले आहेत. हिंदू धर्माच्या यज्ञ संस्कृतीला पर्याय म्हणून त्यांची उत्पत्ती झाली. “अहिंसा परमो धर्म” हा विचार धम्म शिकवण आहे का? “पाणातिपाता वेरमणी सिख्खापदं समादियामी” म्हणजे प्राणी मात्राच्या हत्येपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो, हा विचार यज्ञातील हिंसेचा प्रतिरोधक आहे. यज्ञात प्राण्यांची हिंसा केली जात होती, पशु हे जनतेचे धन समजले जात होते. संपत्तीची हानी करण्यापासून वाचविण्यासाठी पंचशिलावर बुद्धाचे प्रवचन आहे. या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी “विनय पिटका”त त्यांचा उल्लेख आहे. भिक्षु हे संन्यासी असल्याने त्याचे पालन करू ही शकतील पण, भिक्षूंनी आपले नियम जेव्हा गृहस्थावर लादले तेव्हापासून धम्मप्रचार खुंटला व अधम्म हिंदू महायानी प्रचार अर्थात (धर्म प्रचार) सुरु झाला. नियम म्हणजे धम्म सूत्र (तत्व) नाहीत.
विनय पिटक म्हणजे धम्म नाही, ते भिक्षूंचे नियम आहेत. जे नियम बुद्धाने भिक्षुंना शिकवले, पालन करण्यास सांगितले तेच नियम भिक्षूंनी गृहस्थांवर थोपवले. हा प्रकार राजा सम्राट अशोकाच्या आधीपासून झालेला आहे. म्हणून अशोकांनी पंचशिलेला जगात प्रचारित केले. संपूर्ण जगात असा प्रचार झाला आहे कि पंचशील ही बुद्धधम्माची शिकवण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यातून सुटू शकले नाहीत. भिक्षूंनी जे लिहिले ते स्वयं खरे, हा गैरसमज आहे. संतानी जे लिहिले व बोलले त्या सर्वाला कल्याणकारी विचार म्हटलेच पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचे आहे. अनेक संत व भिक्षु वैज्ञानिक दृष्टीकोन जाणत नाही, त्यामुळे ते संशोधक होऊ शकले नाहीत. वैज्ञानिक विचारांवर आधारित भिक्षूंचे साहित्य आहे कि नाही हे तपासणे गरजेचे आहे. धम्म म्हणजे विनय नियम वा पंचशील कसे?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें