सोमवार, 17 जून 2013

चिकित्सा विपस्सनेची............!

दैनिक "जनतेचा महानायक”, मुंबई येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला माजी न्यायाधीश 'अनिल नि. वैद्य' यांच्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा मिलिंद फुलझेले, नागपूर यांनी लिहिली. त्याची हि प्रतिक्रिया)
(१) “अनिल नि. वैद्य हे एम.ए.; एल.एल.एम. पर्यंत शिकलेले असून त्यांनी सहा वर्षे वकिली व नंतर न्यायाधीश झालेले असून ते आता माजी न्यायाधीश आहेत. ते बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आहेत.” - समीक्षक मिलिंद फुलझेले

प्रतिक्रिया-- अनिल नि. वैद्य हे बुद्धधम्माचे गाढे अभ्यासक आहेत कि नाही ते पुढे जनताच ठरवेल. एकट्या समीक्षकाने म्हटले तर होत नाही. कायद्याचे अभ्यासक असणे आणि धम्माचे अभ्यासक असणे यात मोठे अंतर आहे. कायदा म्हणजे धम्म नाही. दिनांक २४ सप्टेंबर १९४४ च्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “जगातील कुठल्याही देशात प्राचीन हिंदुस्थान सारखे गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान बहुधा हा एकच देश असा आहे कि जेथे जगात कोठेही घडली नाही अशी क्रांती घडून आली....बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दांत सांगितली. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास कुण्या अधिकाऱ्याने सांगितलेलीच गोष्ट सत्य आहे/असते, असे नाही.” एखादा व्यक्ती अधिकारी वा न्यायाधीश आहे म्हणून त्यांची बाजू खरी मानू नये तर त्यांच्या ही विचाराला सत्याच्या कसोटीवर तपासले गेले पाहिजे, तसे न करता त्याचे समर्थन करणे म्हणजे अज्ञानी, आंधळेपणाचे लक्षण होय. 

(२) “बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म दीक्षेनंतर अवघ्या ५३ दिवसात महापरीनिर्वाण झाले आणि सारा समाज पोरका झाला. त्यांना धम्म सेमिनरी चालवायचे होते, ते राहून गेले. आम्हाला धम्माचे मुलभूत सिद्धांत, तत्वज्ञान आणि धम्माच्या अंगा-अंगाचे हवे ते आकलन झाले नाही.” समीक्षक--मिलिंद फुलझेले.

प्रतिक्रिया-- बुद्धाचा धम्म हा जबरदस्तीचा नाही. ते तसे बाबासाहेब मार्गदर्शक होते. ज्यांची ईच्छा असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. जो अभ्यास करेल त्यालाच तो समजेल आणि समजला सुद्धा. बाबासाहेबांच्या प्रेरणेने लाखो बौद्ध विहार ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. प्रत्येक विहार म्हणजे धम्म प्रशिक्षण केंद्र होय या दृष्टीने बाबासाहेब विहारांकडे बघत होते. विहाराच्या मधोमध टेबल खुर्च्या आणि भिंतीवर फळा यांची निर्मिती हवी होती परंतु महायानी प्रवृत्तीच्या भिक्षूंच्या मताप्रमाणे बुद्धाची मूर्ती विहाराच्या मध्यभागी ठेवून देवाप्रमाणे तिची पूजा अर्चा सुरु केली. जी मूर्ती किंवा तिचा फोटो विहाराच्या भिंतीवर किंवा बाजूला असला तरी पुरे होते. मूर्तीपुढे बुद्धवंदना घेणे, पंचशील म्हणणे म्हणजे धम्म, अशी समज भिक्षूंनी केलेली आहे, ती बुद्धाने केली नाही. बुद्धाच्या विचाराला, धम्माला बाजूला ठेवून भिक्षूंच्या विनय विचारांना अधिक महत्व दिल्यामुळे मुळ धम्मविचार दूर लोटल्या गेले. 

पत्रकार, वकील, न्यायाधीश, संपादक, डॉक्टर, इंजिनिअर सारखे सुशिक्षित व्यक्ती जेव्हा “द बुद्ध अँड हिज धम्म” वाचू शकतात पण समजू शकत नाही तर ते विहारात किंवा धम्म सेमिनरी (प्रशिक्षण केंद्र) मध्ये काय शिकविणार? बाबासाहेब म्हणतात, “बुद्धाच्या शिकवनुकीतील प्रमुख अंगे कोणती? याचे ज्ञान ज्याला आहे, त्याला सुत्तपिटक सध्याच्या अवस्थेत आहे, ते पाहून आश्चर्य वाटेल. सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? बुद्धाच्या शिकवनुकीशी असबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा ‘बुद्ध देवा’च्या नावाखाली त्यात घुसडल्या आहेत. ब्राह्मणी मठसंप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणीच आदर्शमय होय, ती बुद्धधम्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भाषविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून ‘ऱ्हीस डेविड्स’ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.... सुत्त पिटकाच्या पानापानात खरा गौतम दिसत नाही.” (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड- ६, पृष्ठ- १४८, संकलक- मा. फ. गांजरे, नागपूर) 

दिनांक ८ मे १९५५ ला नरेपार्क, मुंबई येथे “भारतीय बुद्धजन समिती”च्या वतीने बुद्धजयंती पार पाडण्यात आली तेथे बाबासाहेब म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये दोन (हीनयान व महायान) प्रकारचे लोक आहेत. या धम्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. माझे मुख्य कार्य प्रचार करण्याचे आहे. आम्हाला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे, हेच माझे कर्तव्य होय.” (धम्मचक्र प्रवर्तनाय, संकलन- प्रदीप गायकवाड, पृष्ठ- २१४) त्यामुळे संशोधन न करता जो धम्म दिल्या गेला त्यात हिंदू विचारांची भेसळ राहिली आहे. तिला नाली काढून, दूर करून शुद्ध, आसील पाणी करण्याची त्यांची ईच्छा होती पण शरीर साथ देत नसल्याची सूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. 

बाबासाहेबांच्या हातात ‘गौतम बुद्धाचे चरित्र’ बालपणी पडले. त्याचे लेखक गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर होते. त्यांनी ‘पी. एल. नरसू’च्या ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’चा सुद्धा अभ्यास केला. विदेशात अभ्यास करण्यासाठी गेले असता विविध पाश्चिमात्य लेखकांच्या विचारांचाही त्यांनी मागोवा घेतला आणि बुद्धधम्मच पीडितांचा उत्तम आधार होऊ शकतो, हे त्यांनी ठरविले. १. “द बुद्ध अंड हिज धम्म”, २. रिव्होलूसन अंड काऊनटर रिव्होलूसन तथा ३. बुद्ध अंड कार्ल मार्क्स या ग्रंथांचा अभ्यास धम्म समजून घेण्यासाठी करावा, अशी त्यांनी सूचना केली. ५३ दिवसाच्या आधीही बाबासाहेबांनी काय-काय केले, ते कसे विसरता येयील? तो धम्माचा भाग नव्हता का?

(३) “लेखकाने २१ ग्रंथांचे संदर्भ ग्रंथ घेवून १४४ पृष्ठांचा ग्रंथ लिहिला” – समीक्षक मिलिंद फुलझेले/महानायक 

प्रतिक्रिया-- याचा अर्थ हा होत नाही कि जास्त संदर्भ ग्रंथांचे आधार घेवून पुस्तक लिहिले म्हणून ते खरे आहे. संदर्भ ग्रंथाची सूची कितीही मोठी किंवा लहान असो पण त्यातील विचार सत्त्यावर आधारित आहेत कि दंतकथेवर? हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे कि नाही? ब्राह्मणी ग्रंथांना संदर्भ नसतात का? तरीही ते उचित का ठरत नाही?

(४) “शीलधर्म पालन करणे म्हणजे सामाजिक व्यवस्थेचे पालन करणे होय,” - समीक्षक - मिलिंद फुलझेले 

प्रतिक्रिया-- प्राचीन काळात शीला म्हणजे दगड होत होते. दगडावरची रेघ, लेखन म्हणजे भोजपत्रावरील लेखापेक्षा कठोर मानले जायचे. जैन वा इतर लोक कठोर विचारांना व्रत मानत होते. बुद्ध कठोर विचारी नव्हतेच त्यामुळे ते परिवर्तनवादी ठरतात. पंचशील कठोर आहे कि परिवर्तनवादी? ते लोकांनी ठरवायचे आहे. ते जर परिवर्तनवादी असेल तर त्याचे तसे पुरावे मांडावे. शील म्हणजे सदाचार, नेहमी करण्यात येणारे आचार. त्यात कोणते महानपण आहे? चोर ही शील पालन करतात आणि साव सुद्धा शील पालन करतात. ज्या विचारांचे शील असेल त्याविचारांची समाज व्यवस्था बनेल. 

(५) “पंचशील योग्य प्रकारे पाळण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे, मन विकार विहीन ठेवणे, वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्विकार असे निर्मळ जीवन अत्यंत अगत्याचे आहे यासाठीच विपश्यनेचे महत्व आहे.” - समीक्षक मिलिंद फुलझेले/ जनतेचा महानायक 

प्रतिक्रिया-- बुद्धाने सुखी जीवनाचा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, पण पंचशील केव्हा सांगितले? ते समीक्षकाने वा लेखकाने सांगावे. भिक्षु आणि बुद्ध यात फरक आहे. बुद्धाच्या कोणत्या प्रवचनात पंचशील सांगितले आहे? आर्य अष्टांगिक मार्गाला शह, पर्याय देण्यासाठी महायानी पंथाच्या भिक्षूंनी नंतर ते सुत्तपिटकातील पाचव्या “खुद्दक निकाया”त घुसडून दिले आहे. पंचशील म्हणजे धम्म, अशी खोटी धारणा समाजात पसरवली. म्हणून महायानी भिक्षु धम्मदीक्षा देतांना फक्त “त्रिशरण” व “पंचशील”च देतात. भिक्षूंचे विचार बुद्धाच्या नावावर खपविण्याचा याआधी खूप प्रयत्न झाला. त्याच प्रमाणे पुढेही तो चालूच राहील असे नाही. विपस्सनेला सुद्धा बुद्धाच्या नावी खपवण्याचा प्रयत्न अडाणी भिक्षु आणि सुशिक्षित उपासक करीत आहेत. आजकालचे बहुतांश भिक्षु म्हणजे परित्राणसूत्र पाठाचे पुरोहित, पंडित बनले आहेत. ते “ध्यानी” बनले पण “ज्ञानी” नाहीत. म्हणूनच “विपश्यनेचे शिबीर हे बौद्ध धम्म प्रचार-प्रसाराचे प्रभावी माध्यम आहे” असे समीक्षक म्हणतात. विपस्सनेच्या प्रभावाने किती लोकांनी धर्मांतर केले? तो आकडा तरी सांगावा. सत्यनारायण गोयनकाने तरी धम्मदीक्षा घेतली का? 

(६) “मला हेच कळत नाही कि विपश्यनेला सर्रास विरोध दर्शविणे, हे आंबेडकरी बौद्धांचे कर्तव्य आहे का?”- समीक्षक मिलिंद फुलझेले/जनतेचा महानायक 

प्रतिक्रिया-- बौद्धांचे कर्तव्य काय आहे? ते खुद बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगिलते आहे. “इव्हज वीकली” या साप्ताहिकात ‘भारतीय स्त्रियांची अवनती बुद्धाच्या धम्मामुळेच झाली” असा लेख तेव्हा छापून आला. त्याला लामा गोविंद यांनी “महाबोधी” मासिकात उत्तर दिले. “बुद्ध शिकवणुकी संबंधी जे आरोप करण्यात येतात ते खोडून काढणे, हे प्रत्येक बौद्धांचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य लामा गोविंद यांनी बजावले, ते त्यांनी फार उत्तम कार्य केले.” (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे. खंड-सहावा. पृष्ठ-१४७) आचार्य सत्यनारायण गोयनका सुद्धा बुद्धावर आरोप करतात कि ते विपस्सनेचे “जनक” होते. ते त्यांचे आरोप खोडून काढणे, हे कोणाचे कार्य आहे? 

बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “काहींच्या (काही दुसऱ्या लोकांच्या अर्थात बुद्धाच्या नाही) मते विपश्यना ही त्यांच्या (बुद्धाच्या) धम्माची देन आहे....यापैकी काहींचा दृष्टीकोन अशा महानुभावांचा आहे कि ज्यांच्या मनात एखादी वस्तू, तत्व वा सिद्धांत या विषयी विशेष आकर्षण असते, असे लोक म्हणजे त्यांच्या बुद्ध धम्माचे सार हे समाधी, विपश्यना असते असे लोक किंवा धम्म निवडक दीक्षित लोकांचा आहे असे मानणारे लोक होत. त्यांचा या वर्गात समावेश होतो. इतरांचे दृष्टीकोन हे बुद्ध धम्मावर लेखन करणारे बहुतांश लेखक, अभ्यासक हे प्राचीन भारतिय इतिहासाचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या लिखाणाचा परिणाम होय. त्यांचे बुद्धधम्माविषयी अध्ययन हे प्रासंगिक आणि आकस्मिक आहे. त्यांच्या पैकी काही बुद्ध धम्माचे विद्यार्थीच नाहीत. ते मानववंश शास्त्राचेही विद्यार्थी नाहीत. मानववंश शास्त्र हा विषय धर्माचा उद्गम आणि विकास यांच्याशी संबंधित आहे. मुख्य प्रश्न असा उपस्थित होतो कि बुद्धाने कोणताही सामाजिक संदेश दिला अथवा शिक्षा दिली वा नाही? 

“जेव्हा या उत्तरासाठी आग्रह धरला जातो तेव्हा ते बुद्ध धम्माचे अभ्यासक, विद्यार्थी दोन मुद्दे मांडतात. बुद्धाने अहिंसा शिकविली आणि शांतीचा संदेश दिला. बुद्धाने याशिवाय आणखी काही सामाजिक संदेश दिला आहे का? बुद्धाने न्यायाची शिकवण दिली का? मैत्रीची शिकवण दिली का? स्वातंत्र्याची, समतेची, बंधुतेची शिकवण दिली का? बुद्धाने कार्ल मार्क्सला उत्तर देले आहे का? धम्माच्या चर्चेत असे प्रश्न क्वचितच विचारली जातात. माझे उत्तर असे आहे कि बुद्धाने आपल्या सामाजिक संदेशात ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. परंतु अर्वाचीन अभ्यासकांनी या प्रश्नांची उत्तरे अनुल्लेखाने मारून व गाडून टाकली आहेत.” (बुद्धाच्या धम्माविषयी विविध दृष्टीकोन, “बुद्ध आणि त्यांचा धम्म”. समता प्रकाशन, नागपूर, पृष्ठ-१४३ व १४४) यावरून हे सिद्ध होते कि विपश्यना ही “काहींच्या” मते बुद्धाची देन आहे पण बुद्धाच्या वा बाबासाहेबांच्या मते नाही. तेव्हा कोणत्या आधारे ती बुद्धाचीच शिकवण, उपज, शोध आहे? जी बुद्धाची शिकवण म्हणून आंबेडकरी बौद्धांना शिकविली जात आहे? पाकिस्तानी आतंकवाद्यांना आणि कार्ल मार्क्सच्या नक्षलवाद्यांना शांतीचे धडे शिकविण्यासाठी विपस्सनेचा प्रथम प्रयोग करावा.

(७) “मागील ५६ वर्षात एकही हवे तसे “धम्म प्रशिक्षण केंद्र” उभे करण्यात आले का?” – समीक्षक- मिलिंद फुलझेले/ जनतेचा महानायक 

प्रतिक्रिया-- दिल्लीच्या डॉ. आनंद यांनी शेकडो आंबेडकरी विचारांच्या मिशनरी शाळा काढल्या. देशात शेकडो ठिकाणी “पाली भाषा” शाळा कालेजात शिकविल्या जाते. महुचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, बुद्धिष्ट चेअर, आंबेडकर विचारधारा उच्च शैक्षणिक पदवी अभ्याक्रम शिकविल्या जातो. एवढेच कशाला दीक्षाभूमीवर, चैत्यभूमीवर करोडो रुपयांची आंबेडकरी, धम्म ग्रंथ वीकली जातात, ती धम्म शिक्षण प्रशिक्षणाचा भाग नाहीत का? शेकडो आंबेडकरी विचारांची पत्रके, वृत्तपत्रे निघत आहेत, टीव्ही चैनल निघाल्या आहेत, काय कमी आहे? शाळा कोण चालवतो याला महत्व नाही परंतु तिथे कसले शिक्षण मिळते ते महत्वाचे आहे? 

शासन कोण चालवतो हे महत्वाचे नसून तिथे शोषण होते कि नाही? ते बघणे अधिक सोयीष्कर आहे. ‘जे गोयनका गुरुजीने केले, ते तुम्ही तरी केले का?’ असा प्रश्न आडमार्गाने समीक्षक विचारीत आहे. गोयनका गुरुजी विपश्यनेच्या प्रशिक्षण केंद्रातून हिंदू धर्माचा प्रचार करतात तर आम्ही ही करायचा का? श्रीमंत आणि अंध:भक्त बुद्धाची टिंगल करण्यासाठी विपश्यनेच्या प्रचाराला करोडो रुपयांची मदत करतात, पण जातिवाद, वर्णवाद, अंधश्रद्धा, पुंजीवाद संपवण्यासाठी का काहीच मदत करीत नाहीत? जातिवाद संपविणे हे धम्माचे कार्य होते ते का विपस्सनावादी करीत नाही? किती आंतरजातीय विवाह सोहळे गोयनका गुरुजीने आयोजित केले? केवळ डोळे लावून नाकाने हवा झोकने म्हणजे बुद्धधम्म प्रचार होतो का? (हातात वर्तमान पत्र असले कि गैरसमज पसरविणे सोफी होते, महायान आणि जातीवादी विचारांचा प्रचार/प्रसार करणे म्हणजे आंबेडकरी विचार होत नाहीत.)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें